पांडवांचे आक्रमण आणि द्रुपद बंदी
कौरवांचे पांचालवर आक्रमण केल्यावर पांचालनरेश द्रुपदने प्रतिहल्ला करून कौरव कुमारांना बंदी बनवून टाकले. पण पाच पांडव काही केल्या सापडले नाही. द्रुपदने सर्व सैनिकांना आदेश दिला कंपिल्या नगर व त्याच्या आसपासच्या परिसरात जाऊन त्या पाच कुमारांना शोधून आणा म्हणून आदेश दिला. तेवढ्यात धनुष्यातून बाण सुटावा तसे पाचही वीर पांडव वेगाने पांचाल सेनेकडे येत होते. सर्वात पुढे गदा धारण करून भीमसेन त्याच्या पाठीमागे रथात धनुर्धारी अर्जुन. अर्जुनाच्या रथाच्या पाठीमागे धर्मराज युधिष्ठीर याचा रथ आणि त्याच्या रथाचे रक्षण करणारे खड्गधारी नकुल आणि सहदेव. हा पांडवांचा येणार बाण थेट पांचालच्या सेनेत घुसला.
भीमसेन आपल्या भल्या मोठ्या पोलादी गदेने एखादा मदमस्त पिसाळलेला हत्ती वनांमध्ये घुसून वनांचे जसे नुकसान करतो आणि त्याला आवरणे अशक्य होतं त्याप्रमाणे पांचालचे सैन्य हवेत उडू लागले. आणि त्यातील कोणी जरी वाचले तर त्यांना अर्जुन आपल्या तीक्ष्ण बाणाने वेधून काढी. नकुल, सहदेव आपल्या जेष्ठ बंधू युधिष्ठीर सहित पांचाल सेना कापत कापत थेट द्रुपदच्या रथाला भिडले.
द्रुपद - अर्जुन युध्द
द्रुपद आपल्या चालत्या रथावरून आपल्या धनुष्या द्वारे वर्षा करावी त्या प्रमाणे बाणांची वर्षा करू लागले. पण अर्जुनाने त्याचे उत्तर आपल्या वायू अस्त्राने दिले ते सर्वच्या सर्व बाण हवेतल्या हवेतच भिरकावुन लावले. त्या नंतर अर्जुनाने द्रुपदचा सारथी मारून रथ एका जागेवर स्थिर केला. द्रुपदाने आपल्या भात्यातील एक बाण काढून तो बाण अग्नी अस्त्राने अभिमंत्रित केला, तो बाण अर्जुनाच्या रथावर सोडला. अर्जुनाने हे जाणून धनुष्यावर वरुणअस्त्राचा मंत्र उच्चारला आणि रथाच्या दिशेने येणारा तो अग्नीबाण हवेतच थंड केला. अर्जुनाने चपळता दाखवत द्रुपदच्या हातातील धनुष्य भंग केला. दुसरा धनुष्य घ्यायच्या आत अर्जुनाने पाश अस्त्राने द्रुपदाला रथावरच बंदी केले. जाड अश्या दोरखंडाच्या साहाय्याने द्रुपद बंदी झाला. अर्जुनाने आपल्या कटीवरील खड्ग हातात घेवून रथातून उडी घेतली, आणि थेट चालत तो पांचाल नरेश द्रुपद यांच्या रथावर चढत द्रुपदाच्या गळ्याला हातातील खड्ग लावून सेनेला म्हणाला " थांबा ! पांचालराज द्रुपद बंदी झाले आहेत, सर्वांनी आपले शस्त्र खाली ठेवावे, नाही ठेवले तर आपल्या राजाचे मस्तक धडा वेगळे झालेच समजा."
द्रुपद बंदी
अर्जुनाच्या आदेशाप्रमाणे सर्वांनी आपआपली शस्त्रे खाली ठेवली. पांडवांकडून आज पांचाल आज पराभूत झाले होते. युधिष्ठीराने तिथल्या पांचाल सैनिकांना आदेश दिला की " शंभर कौरव बंधूंना त्वरित मुक्त करावे," त्या आदेशाबरोबरच त्यांनी कौरवांना मुक्त केले. बंदी झालेल्या अवस्थेत अर्जुनाने द्रुपदला रथात घातले आणि स्वतःही रथात बसून हस्तिनापूर सीमेच्या दिशेने निघाला. त्या रथा मागे युधिष्ठीर, भीम, नकुल, सहदेव यांची रथ ही निघाले. चर्मण्वती नदी किनारी द्रोणाचार्य आपल्या शिबिरात बसले होते तेव्हा अचानक घोडे आणि रथाचा आवाज ऐकून बाहेर आले. त्यांनी पहिले की धनुर्धर अर्जुनाच्या रथात पांचाल नरेश द्रुपद खाली मान घालून दोरखंडाने बंदी झालेला पाहून गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्याना दिलेल्या विद्येचे, शिक्षणाचे सार्थक झाल्याचे समाधान झाले. त्याचबरोबर अर्जुनाने धनुर्विद्येचा उपयोग करून पांचाल सारख्या बलाढय शत्रूचा सुध्दा पराभव केल्याचे पाहून त्यांची छाती गर्वाने भरून गेली.
द्रोणाचार्यांच्या मनात एक विचारांचे वादळ निर्माण झाले. पांचाल नरेश द्रुपदाने भरसभेत केलेला द्रोणाचार्य यांचा अपमान, विद्येचा केलेला उपहास, ते विसरले नाहीत, त्याचाच प्रतिशोध आज पूर्ण झाला. द्रुपदने आपले मस्तक झुकविलेले होते, दोरखंडात त्यांना जखडले होते, एकीकडे नकुल आणि दुसरीकडे सहदेव यांनी त्यांना दोरखंडाच्या साहाय्याने खेचत होते. पांडव द्रुपदाला घेऊन जवळ येताच, जेष्ठ पांडव युधिष्ठीर यांनी प्रणाम करून नम्रपणे म्हणाला " हे गुरुदेव आम्हांकडून आपण सांगितलेली गुरुदक्षिणा स्वीकार करावी." गुरु द्रोणाचार्य खुश होऊन म्हणाले " पांडवांनो तुमचे सदैव कल्याण होवो, यशस्वी भव: " त्यांनी द्रुपदाला दोरखंडातून मुक्त करण्याचा आदेश दिला. गुरु द्रोणाचार्य म्हणाले " हे पांडवांनो, आपली गुरुदक्षिणा मला मान्य आहे. माझ्या मित्राला आता मुक्त करा." द्रुपदने आश्चर्याने आपली मान वर केली त्यांना हे काय होतंय काहीच कळेना. नकुल - सहदेव यांनी पांचाल नरेश यांना दोरखंडाच्या बंधनातून मुक्त केले.
अपमानाचा वचपा
द्रोणाचार्य उपहासाने द्रुपदाला म्हणाले " हे मित्र द्रुपद, पाहिलंस का ?, मी केवळ मैत्री मागितली होती, तू तर मैत्री सोडच उलट माझा अपमान केला होतास, आणि मला म्हणाला होतास की मैत्री फक्त बरोबरी असणाऱ्यातच होऊ शकते. बघ ! आज मी संपूर्ण पांचाल राज्य जिंकून राजा झालो आहे. पण तुझ्याकडे कुठे राज्य आहे. तू तर माझ्या बरोबर मैत्री करण्यास सुध्दा योग्य राहिला नाहीस, पण मला तुझी केवळ मैत्री हवी होती मित्र द्रुपदा !, तू माझा आणि माझ्या विद्येचा अपमान केला होतास तेव्हा मी शपथ घेतल्या प्रमाणे माझा शिष्यच तुझा पराभव करेल असे म्हणालो होतो ते वचन माझ्या शिष्यानी पूर्ण केले आहे, तू म्हणाला होतास ज्याला राज्य नाही तो राजाचा मित्र असू शकत नाही. म्हणून मी तुझे संपूर्ण पांचाल शिष्यांकरवी जिंकले आहे , या माझ्या पांचाल राज्याचे अर्धे राज्य म्हणजे गंगेच्या दक्षिणेकडील अर्धे पांचाल राज्य तुला देतो. आणि उत्तरेकडील अर्धे पांचाल राज्य मी स्वतःकडे ठेवतो. आता आपण दोघेही राजे झालो आहे. आता आपल्यात मैत्री असण्यात काहीही हरकत नाही."
द्रुपद खजील होऊन, खाली मन घालून चालत आपल्या कंपिल्या नगराकडे निघून गेला.
to be continued....