रविवार, २५ डिसेंबर, २०२२

हिडिंब राक्षस वध

 

 गंगाकिनारच्या वनांत प्रवेश 

पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आणि माता कुंती आता पूर्णपणे थकले होते. कुंती म्हणाली " पुत्रांनो खूप तहान लागली आहे रे, कोणीतरी जल आणाल का ?" रात्रभरच्या पायी प्रवासाने सर्वांनाच आता खूप तहान लागली होती. सहदेव म्हणाला "भीम भ्राता ते पहा सारस पक्षी दिसत आहेत म्हणजेच जवळपास जलाशय आवश्य असणार " मग भीमाने एक जवळच असलेल्या विस्तीर्ण, सुंदर आणि गर्द सावली देणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली नकुल, सहदेव आणि माता कुंतीला खाली उतरविले. आणि म्हणाला " मी जल घेऊन येतो " असे म्हणून तो निघून गेला. भीमसेन ने आपल्या शरीरावरील वस्त्र जलाशयातील जलात भिजवुन तो घेऊन आला. तो पर्यंत माता झोपली होती. भीमाच्या मनात असे वाटू लागले की, एका समृध्द कुंतिभोज राजाची कन्या, द्वारकाचे राजा वसुदेव यांची भगिनी, हस्तिनापूर साम्राज्याची महाराणी आज वनांत एका वृक्षाखाली भूमीवर झोपली आहे, अरे, धिक्कार आहे आम्हा पाच - पाच महारथी पुत्रांचा धिक्कार आहे. तेव्हा सर्वांनी भीमाने आणलेले थोडे थोडे जल प्राशन केले, श्रमाने थकल्याने तेथेच निद्रिस्थ झाले. पण भीमास काही झोप येत नव्हती तो फक्त शकुनी, दुर्योधन यांनी केलेल्या कृत्याचा कसा प्रतिशोध घ्यावा याचाच विचार करत होता.

राक्षस हिडिंब आणि हिडिंबा 

पांडव ज्या वनात निद्रिस्थ झाले होते ते वन हिंस्त्र पशु - पक्षी, आणि नरमांस भक्षक राक्षस यांचे होते. तेव्हा त्या वनाचा राक्षस राजा हिडिंब आपल्या राक्षस भगिनी हिडींबा सोबत राहत होता. हे राक्षस नरमांस भक्षक तर होतेच त्याबरोबर मायावी पण होते, आपले रूप लगेच बदलत असत. हिडिंब राक्षस याला वासावरून कळाले की पाच नरासोबत एक स्त्री पण आहे, त्याने आपल्या भगिनींचा सांगितले " हिडींबा, त्यांना आपल्या निवासस्थानी घेऊन ये जा, खूप दिवसांनी आपल्याला मनुष्याचे मांस मिळणार आहे त्वरीत जा. " हिडिंबाने आपले रूप एका सुंदर स्त्रीचे केले होते, ती जेव्हा पांडवांजवळ आली पांडव आणि कुंती थकल्याने निद्रिस्थ झाले होते, तेव्हा ती थक्कच झाली कारण भीम जागाच होता, त्याला निद्रा लागत नव्हती, मनुष्यामध्ये एवढा बलवान, धिप्पाड शरीरयष्टीचा मनुष्य हिडींबा प्रथमच पाहत होती, ती आता भीमावर पूर्णपणे मोहित झाली होती. तेव्हा भीमाने तिला पहिले आणि विचारले, " हे स्त्री कोण आहेस तू ?" हिडिंबा म्हणाली " हे मनुष्य मी राक्षसी हिडींबा आहे, माझा बंधू राक्षस राज हिडींब आपल्याला मारेल तुम्ही लवकरात लवकर येथून निघून जा." भीमाला काहीच कळेना, तो चक्रावून गेला की राक्षसी स्त्री असून आपली मदत का करत असावी ? हिडिंबा म्हणाली, " हे नरश्रेष्ठ, आपली शक्ती, आपली शरीरयष्टी पाहून मी मोहून गेले आहे, मी आपणाला मनोमन वरले आहे, पण भीती वाटते की माझा बंधु हिडिंब इथे केव्हाही येईल याची तेव्हा आपण सर्व लगेच निघून जावा."

भीम -हिडिंब युध्द

इकडे राक्षस हिडींब विचार करू लागला की, हिडींबा एवढा समय का लावत आहे त्या पाच मनुष्य आणि एक स्त्री यांना मोहवुन आणण्यासाठी ? या यापूर्वी कधी एवढा समय तिने नाही लावला. आता हिडींबला भूक अनावर होऊ लागली होती, आणि तो खुश पण होता कारण कित्येक दिवसांनी त्याला मनुष्याचे मांस मिळणार होते. तो तडक पांडव जिथे झोपले होते तिथे आला. त्याने पाहिले की हिडींबा आपले रूप पालटुन सुंदर स्त्री वेशात भीमासमोर नजर झुकवून उभी होती. याचा त्याला खूप क्रोध आला, " हिडिंबे, मी तुला यांना आणायला सांगितले होते, तर तुच यांच्याजवळ रक्षणासाठी बसलेस, तुला तर मी नंतर पाहेंन प्रथम यांचा समाचार घेतो असे म्हणुन तो भीमाच्या अंगावर धावत गेला. भीमसेन तयारच होते, भीमाने विचार केला की हे श्रमाने थकून आत्ताच विश्राम करत आहेत यांची निद्रा का मोडावी, का बरे त्यांच्या निद्रेत बाधा आणावी, बंधु आणि माता हे निद्रेतून जागे होऊ नये म्हणून भीम स्व:ताच पुढे जाऊ लागला. दोघेही मोठमोठ्याने गर्जना करून एकमेकांना आव्हान दिले. दोन मद मस्त हत्ती जेव्हा एकमेकांना भिडतात त्याप्रमाणे हे दोन विशालकाय देहाचे भीम आणि हिडिंब राक्षस एकमेकांना भिडले. प्रथम बाहू युध्द सुरु झाले, कधी भीम त्यांना मागे रेटत तर कधी हिडिंब भीमाला मागे रेटत, बऱ्याच वेळानंतर त्यांनी उंच, आणि मोठ - मोठाले वृक्ष उपटून एकमेकांच्या देहाकडे फेकू लागले. हे असले भयंकर आवाजाने कुंती सहित इतर पांडव उठले त्यांना काही कळेचना तेव्हा तेथिल हिडिंबेने सर्व हकीकत सांगितली. ती  म्हणाली " हे माता आपण सुध्दा एक स्त्री आहेत, मी माझे मन आपल्या पुत्राच्या चरणांवर वाहिले आहे. मी मनोमनी त्यांना वरले आहे तेव्हा आपणच काय तो निर्णय करा." तेव्हा अर्जुन, भीम -हिडिंब युध्द करत होते तेथे पोहचला आणि तो भीमाला म्हणाला " भीमदादा, याच्याशी अधिक समय युध्द करत बसू नको, आपल्याला पुढे आणखी जायचे आहे, आणि रात्र समयी या राक्षसांची शक्ती अधिक वाढते होते, तेव्हा त्वरित याचा वध करून टाक. " असे म्हणताच भीमाने लढवत ठेवलेल्या हिडिंबला म्हणाला " आता तुझ्या पापाचा घडा भरला आहे मृत्यूस तयार हो " असे म्हणून भीमाने त्याला सरळ पूर्णपणे उचलून जवळच असलेल्या मोट्या पाषाणावर आदळले हा भीमाचा महाभयानक आघात तो राक्षस सहन करू शकला नाही तेव्हा तो तिथेच गतप्राण झाला .

To be continued...

पांडवांचे अंत्यविधी आणि श्राध्दकर्म


अग्नितांडवातून पांडव बचावले 

आणि इतर चार बंधूनी लाक्षागृहाच्या वेगवेगळ्या दिशेने अग्नी दिला शेवटी सर्व युधिष्ठिराच्या कक्षात येऊन जेथून भुयार खोदला आहे, तेथुन हळू हळू भुयारात जाऊ लागली. तो विवर ज्या गुप्तचराने खणले आहे तो सर्वांत पुढे त्या पाठीमागे युवराज युधिष्ठीर, माता कुंती, नकुल सहदेव, अर्जुन आणि शेवटी भीमसेन असे त्या विवरातून थेट गंगाकिनारी निघाले. पाठीमागे वळून सर्वजण पाहू लागले, तो अग्नी संपूर्ण लाक्षागृहाला एका क्षणात भस्म करून टाकेल अश्या प्रकारच्या ज्वाला आकाशाच्या दिशेने झेपावत होते. तो भयंकर अग्नी तांडव पाहून वारणावत नगरांतील नगरजण मोठा आक्रोश करून ती आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. पण तो अग्नी अति विशाल रूप धारण केला होती. तेव्हा हे दृश्य पाहून माता कुंतीच्या डोळ्यातून अश्रू आले. कुंती म्हणाली "आम्ही काय कुणाचे वाईट केले होते भगवंता, कसली शिक्षा करतोस आमच्यावर ? " तेव्हा युधिष्ठीर माता कुंतीला समजावून शांत करतो, मग भीमाने माता कुंतीला आपल्या खांद्यावर घेतले, आपल्या दोन्ही कमरेवर नकुल आणि सहदेव मागे घेऊन निघाला सर्वांत पुढे गुप्तचर, युधिष्ठीर आणि सर्वांत पाठीमागे अर्जुन या प्रमाणे गंगाकिनारी पोहचले. ( महाभारत आदिपर्व अध्याय १४७ श्लोक १२२ ) 

पांडव गंगाकिनारी पोहचले 

गंगाकिनारी आल्यावर गुप्तचर ने विचित्र पक्षीचा आवाज काढला तेव्हा झाडीमध्ये दडून बसलेले काही नावाडी बाहेर आले त्यांनी युवराज आणि माता कुंतीला प्रणाम केला. तेव्हा पाच पांडव आणि माता कुंती त्या नावे मध्ये बसले तो गुप्तचर युधिष्ठिराला म्हणाला " युवराज हे माझे सहकारी आहेत तो तुम्हाला गंगा पार करवतील, मला महात्मा विदूरने इथपर्यंत आपल्याला लाक्षागृहातून सुरक्षितपणे बाहेर काढून या गंगा नदी किनाऱ्यापर्यंत पोहोचवायला सांगितले आहे मला तो विवर पुन्हा बंद करायचा आहे त्याने कोणताच संशय उरणार नाही. तेव्हा युवराज आता आपण त्वरित नावेत बसून गंगा पार व्हावे ही विनंती." युधिष्ठीर म्हणाला " गुप्तचर, आम्ही आपले शतशः आभारी आहोत." आणि प्रणाम केला तेव्हा तो गुप्तचर लगेच युधिष्ठीरचे हात पकडत म्हणाला " नाही, नाही युवराज हे काय करताय हे तर माझे कर्तव्यच आहे." युधिष्ठीर म्हणाला " आम्ही गंगा पार करून पुढे कोठे जावे ? काकाश्री विदूर यांचे काय मत आहे ? गुप्तचर म्हणाला " युवराज महामंत्री विदुर यांच्या मते, पुढे आपण सर्व गंगापार करून त्या पलिकडील वनांचा आश्रय घ्यावा हस्तिनापूर येथील परिथिती शांत झाल्यावर आपणास कळवले जाईल. तो पर्यंत आपण आपली ओळख गुप्त राखावी. कोणत्याही नगरांत जाऊ नये शकुनीचे गुप्तचर शोध घेत असावेत, तेव्हा आपण जपून, एकत्र, सुरक्षित राहावे. असा विदुरजीनी आपणांस संदेश दिला आहे." युधिष्ठीर म्हणाला " जशी काकाश्रीची इच्छा, त्यांना आमचा प्रणाम सांगा." असे म्हणून सर्वजण नावेत बसले आणि गंगेच्या पाण्यात ती नाव हळूहळू पुढे जाऊ लागली. 

हस्तिनापूरमध्ये शोकाकुल वातावरण 

इकडे वारणावतांमध्ये लाक्षागृहाला अग्नी लागून जो काही अग्नी तांडव होऊन कुंती सहित पाच पांडव नष्ट झाले ही वार्ता कळाल्यावर संपूर्ण हस्तिनापूरमध्ये शोकाचे वातावरण पसरले, सम्राट धृतराष्ट्र यांनी राज्यांत दुखवटा जाहीर केला, स्वताः पितामह भिष्म, विदुर, शकुनी आणि महत्वाचे मंत्रीगण सहित सर्व त्यांचे त्यांची अस्थी एकत्र करून अंत्यविधी करण्यासाठी गेले. 

पांडव अंत विधि श्राध्दकर्म

वारणावतामध्ये लाक्षागृहात पांडव जळाले त्या जागेवर येऊन राखेमध्ये पांडवांचे अस्थि एकत्र करू लागले, तेव्हा त्यांना अनेक अस्थि आढळून आल्या, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार पांडवांशिवाय पुरोचनचा परिवार आणि दास - दासी हे सुध्दा या अग्नी मध्ये नष्ट झाले असावेत. ते सर्व अस्थि एकत्र करून हस्तिनापूरमध्ये आले तेव्हा मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूस जनसागर आला होता, आक्रोश करत होते, मोठमोठ्याने रडत त्यामागे जात होते. शोकग्रस्त आवस्थेत सर्व जण गंगेच्या किनाऱ्यावर थांबले पितामह भिष्म, महात्मा विदुर, सम्राट धृतराष्ट्र यांनी गंगेच्या शुध्द पाण्यात त्यांचे अस्थि विसर्जन केल्या. 

विदुराचे भीष्मांना सत्यकथन 

पितामह यांना या वृध्दअवस्था हा आघात न झेपावणारा होता. याची पूर्ण कल्पना विदुराला होती. तेव्हा गंगाकिनाऱ्याहून हस्तिनापूरकडे जात असताना महात्मा विदुर पितामह भिष्म यांच्या रथाचे सारथ्य करतात आणि तो रथ हस्तिनापूरच्या दिशेने न घेता एका वनांच्या दिशेने घेतात, निर्जन जागा पाहून विदुर रथ थांबवुन भीष्मांना रथातून बाहेर येण्याची विनंती करतात, भिष्म म्हणाले " पुत्र विदुर मला या निर्जन अरण्यामध्ये का आणलेस ?" विदुर म्हणाले " तातश्री, मला आपले दुःख पाहावले नाही." अत्यंत दुःखी होऊन भिष्म म्हणाले " कसे पाहवणार पुत्र माझे नातु, या वृध्द आजोबा पेक्षा लवकर गेले मग दुःख नाही का होणार ?" विदुर म्हणाले " ताताश्री आपण या दुःखाचा त्याग करावा, आपले पांडव आणि कुंती जिवंत आहेत." या विदुराच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही भिष्म आश्चर्य चकित होऊन म्हणाले " काय कुंती आणि पांडव जिवंत आहेत ? तू खरे कथन करतोस ना, मग आपण हे कोणाचे अस्थि विसर्जन केलेत ? कसे काय घडले हे मला सविस्तर सांग पुत्रा " तेव्हा महात्मा विदुरांनी सर्व वृत्तांत विस्तृतपणे पितामह भीष्मांना कथन केला. तेव्हा भीष्मांचे मन शांत झाले आणि दोघेही हस्तिनापूरकडे निघून गेले.  ( महाभारत आदिपर्व अध्याय १४९ श्लोक १८-१९ )              

To be continued...


लाक्षागृह दहन 

 


लाक्षागृहात प्रवेश




वारणावत नगरात पोहचल्यावर सर्व पांडव आणि त्यांची माता कुंती यांची राहण्याची व्यवस्था नागरापासून दूर एका नवीन, प्रशस्थ, विस्तीर्ण अश्या जागेवर पुरोचन याने महाल बनविला होता, त्यांच्या देखभाल, सुरक्षा यांची जबाबदारीही पुरोचन यांच्यावरच होती. पांडवांचे रक्षण त्यांची राहण्याची, जेवण्याची आणि दिखभालीची जबाबदारी पुरोचन यांच्यावर होती.

वारणावत नगरात पोहचल्यावर सर्व पांडव आणि त्यांची माता कुंती, यांनी आपले रथ त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती, तेथे येतात तो राजमहाल पाहून सर्वजण थक्क होतात. भीम म्हणाला " पुरोचन, एवढा सुंदर महाल हस्तिनापूर मध्ये सुध्दा नाही, कसे काय एवढा खर्च केले आहे इथे. " पुरोचन मोठेपणाने खुदकन हसून म्हणाला " कुमार, हस्तिनापूर युवराज येणार म्हणून मागील कित्येक वर्षांपासून हे महाल तयार करणे चालू आहे, आणि याचे नाव लाक्षागृह असे आहे. " सहदेव म्हणाला पुरोचन महाशय मला हा प्रश्न पडला आहे की हा एवढा भव्य महाल नगरापासून दूर का केला असेल, नगराजवळ पण हा महाल होऊ शकला असता.?" पुरोचन कपाळावरील घाम पुसून म्हणाले " तसे काही नाही कुमार ही हवेशीर जागा आहे म्हणून ही जागा निवडली एवढीच." पण सहदेवाला या उत्तराने समाधान झाले नाही. कुंती म्हणाली,"मला कधी एकदा महादेवाचे दर्शन घेऊ असे झाले आहे." पुरोचन म्हणाले राजमाता आपण आत्ताच आलात आजचा दिवस आराम घेऊन उद्या प्रातःकाळी भगवान महादेव यांचे दर्शन करण्यासाठी जावे, मी आपल्या सर्वांची दर्शनाला जाण्याची तयारी करतो. असे म्हणून पुरोचन निघून गेला.

विदुरचा गुप्त संदेश




पुरोचनाने आपल्या सेवेने सर्वांचे मन जिंकले होते. त्या बरोबरच सर्व पांडवांसाठी एक स्त्री - पुरुष सेवेसाठी दिला होता. कुंतीसाठी सुध्दा एक दासी आणि दास त्यांच्या हाताखाली सर्व कामे करण्यास दिला होता. हा आदर सत्कार पाहून कुंती माता ही खूप खुश होत्या. दुसऱ्या दिवशी सर्वांनी वारणावत नगरातील प्रसिध्द महादेव मंदिरामध्ये जाऊन भगवान महादेव यांचे दर्शन घेतले. आणि सर्व जण परत राजमहालाकडे आले. पण युधिष्ठिराच्या मनामध्ये एक प्रश्न सतत येत होता की काकाश्री विदुर यांनी मला म्लेंछ भाषेमध्ये असे का सांगितले असेल की वनांत जर वणवा पेटला असेल तर सर्व प्राणी, पशु - पक्षी, वृक्ष - वेली नष्ट होतात पण मूषक, उंदीर हा एकाच प्राणी त्यातून मार्ग कडून आपले प्राण वाचवू शकतो, कारण तो आपले मार्ग जमिनीवरून न शोधात जमिनी खालून मार्ग तयार करतो. मूषक कोण, मूषकाचे जमिनी खालून मार्ग म्हणजे या विचारताच युवराज गढून जातात.

महात्मा विदुर आपल्या गुप्तहेर यांना सांगतात की लाक्षागृहा पासून दूर अंतरावर कोणाच्या दृष्टीस न येण्यासारखे लाक्षागृहाच्या आतपर्यंत लवकरात लवकर एक भुयारी मार्ग तयार करा, आणि दुसरे टोक अरण्यात काढा. त्याने पांडवांचे प्राण वाचले पाहिजे.

अन्नदानाचा संकल्प




अशा प्रकारे जवळपास पांडव वर्षभर लाक्षागृहात राहिले. राजमाता कुंतिनी नगरातील अन्न दान करण्याचा संकल्प केला. तेव्हा लाक्षागृहाकडे नगरजणांची रांगच लागली. हळू हळू दिवस जाऊ लागले. पांडव शिकारीच्या निमित्याने बाहेर पडत घनदाट जंगलातील रानवाटा माहित करून घेऊ लागले. हस्तिनापूरहुन एक संदेश पुरोचन यांस आला की, दोन दिवसांनी रात्री हे लाक्षागृह महाल पेटवून द्या. नेमका हा खलिता पुरोचन वाचताना अर्जुन चोरून ऐकले, तो पळत येऊन आपल्या सर्व बंधू आणि कुंती मातेला येऊन सांगतो. अर्जुन सांगतो " माता, जेष्ठ, पहा हा पुरोचन दोन दिवसांनी आपल्यासहित संपूर्ण लाक्षागृहाला भस्म करू पाहतोय, मी तर म्हणतो आजच आपण हे लाक्षागृह पेटवून देऊ आणि निसटून जाऊ." युधिष्ठीर म्हणाला " नाही अर्जुन त्यांना आपला संशय येईल, आपण उद्याच रात्री जाऊ, त्यांना हे जाणवू देता कामा नये की आपल्याला हे माहिती झाले आहे. मला आत्ता कळाले की काकाश्री विदुर या भुयाराविषयी बोलत होते ते खरंच किती काळजी करतात आपल्या सर्वांची, आता तुम्ही सर्व जण आपआपल्या कक्षांमध्ये विश्राम करण्यासाठी जा, काही दगा झाल्यास लगेच माझ्या कक्षांत या माझ्या कक्षांपासूनच ते भुयारी मार्ग दूर वनांत निघतो असे विदुर काकांच्या गुप्तचाऱ्याने मला सांगितले आहे. तो पर्यंत भुयारी मार्ग पूर्ण झाला होता.

भिल्लिणी आणि पाच पुत्र

दुसऱ्या दिवशी किती तरी नर - नारी लाक्षागृहांत भोजन करून निघुन गेली. रात्र झाली, अन्न संपत आले. पांडवांनीही आपआपले भोजन करून आपआपल्या कक्षांत विश्रांतीसाठी निघून गेले. तेव्हा मध्यरात्री एक वृध्द भिल्लिणी आपल्या पाच पुत्रांसहित लाक्षागृहात आली. त्यांनी आम्ही कित्येक दिवस भुकेले आहोत आम्हांस कळाले आहे की हस्तिनापूर युवराज अन्नदान करत आहेत तेव्हा कुंतीने त्यांनाही येथेच्छ भोजन देऊन तृप्त केले, ते निघणार तेव्हा कुंतीने त्यांना मध्यरात्री कोठेही न जात येथेच विश्राम करावा असा आग्रह केला. पण ही वार्ता पुरोचन यास माहिती नव्हती, कारण ते मध्यरात्री आले होते. तो मनातल्या मनात म्हणाला करून घ्या किती अन्नदान करायचे आहे ते उद्या ते करता येणार नाही तुम्हाला, उद्याची शेवटची रात्र असणार आहे. आपण पांडवांना उद्या लाक्षागृहांसहित अन्नीच्या स्वाधीन करणार आहोत या विचारानेच आनंदी होऊन मनसोक्त मद्य प्राशन करून सैनिक आणि सेवकांसहित झोपी गेला. इकडे चार पांडव माता कुंतीसह युधिष्ठीर यांच्या कक्षात आले त्यांनी त्याच कक्षातील आपआपल्या हातात जळते मशाले घेतले प्रथम भीमाने सर्व जण निद्रित आवस्थेत आहेत हे पाहून सर्व लाक्षागृहाच्या द्वाराला अग्नी लावला, म्हणजे कोणी बाहेर पडता कामा नये, आणि इतर चार बंधूनी लाक्षागृहाच्या वेगवेगळ्या दिशेने अग्नी दिला शेवटी सर्व युधिष्ठिराच्या कक्षात येऊन जेथून भुयार खोदला आहे, तेथुन हळू हळू भुयारात जाऊ लागली.




to be continued....

पांडव आणि लाक्षागृह 

 


युधिष्ठिराचा राज्याभिषेक

हस्तिनापूर राज्यामध्ये कौरव आणि पांडव यांच्यात वैर भाव वाढतच होता. रंगमंचाच्या प्रदर्शनाने तो अधिकच वाढला. सम्राट धृतराष्ट्र, धनुर्धारी अंगराज कर्ण, दुर्योधन, दुःशासन, मामा शकुनी यांच्यामुळे त्यांच्यातील व्देष अधिकच वाढला, पण हस्तिनापूरच्या प्रजेचे सम्राट पांडुवरील प्रेम, आणि पांडवांवरील आपुलकी वाढू लागली. या कारणाने धृतराष्ट्र यांनी मंत्रीमंडळ आणि प्रजेच्या दबावाने युवराज पदावर आपला जेष्ठ पुत्र दुर्योधन यास न बसवता जेष्ठ पांडू पुत्र युधिष्ठीर याची नेमणूक नाईलाजाने करावी लागली. नेमकी हिच घटना शकुनी, दुर्योधन, दुःशासन यांना सहन झाली नाही. त्यांनी दुर्योधन युवराज पदावर बसावेत यासाठी काय करावे याचा ते विचार करू लागले.

शकुनी आणि पुरोचन यांनी मिळून मिसळून काहीतरी षडयंत्र रचले असावे, असा वारंवार महामंत्री विदुर यांना सारखा संशय येत होता पण तो कोणासाठी आहे ते मात्र कळत नव्हते. पुरोचन हे वास्तूविशारद होते. त्यांचे शकुनीच्या कक्षाकडे येणे जाणे वाढले होते. महामंत्री विदुर यांनी आपल्या गुप्तहेरांना योग्य सूचना दिल्या होत्या, पण काही केल्या त्यांच्या मनात काय शिजतंय याची किंचितही ते माहिती लागू देत नसत.





वारणावत नगरजणांकडून आमंत्रण

कुरु साम्राज्याच्या युवराजाला गादीवर बसून एक वर्ष उलटले होते, तेव्हा दरबारात वारणावत नगरांतील काही प्रमुख नगरजन आले होते, तेव्हा महामंत्री विदुर यांनी विचारले " सम्राट वारणावत नगरांतील काही नागरीक आपल्याला भेटावयास आले आहेत, आपण आज्ञा दयावी." सम्राट धृतराष्ट्र म्हणतात " त्यांना सन्मानाने घेवून या. " तेव्हा वारणावत नगरजन दरबारात येतात. त्यांनी सम्राट धृतराष्ट्र, पितामह भीष्म, महामंत्री विदुर, युवराज युधिष्ठीर, मामा शकुनी, या सर्वांना प्रणाम केला. महामंत्री विदुर म्हणाले "बोला, आपण का आलात, आपली काय समस्या आहे ?" त्या नगरजना पैकी एक जण म्हणाला " सम्राट धृतराष्ट्र यांचा विजय असो, सम्राट आम्ही वारणावत या नगरातून आलो आहोत, त्या ठिकाणी देवादिदेव महादेव यांचे खूप जुने मंदिर तेथे दरवर्षी शंभु महादेव यांचा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. कुरु राजघराण्यातील राजा किंवा युवराज हे वंश परंपरेनुसार या उत्सवाला येत असतात. त्या प्रमाणे या वर्षीही आपण येऊन आम्हा वारणावत नागरजणांना उपकृत करावे, अशी आमची इच्छा आहे." सम्राट धृतराष्ट्र हसत म्हणाले, हे वारणावत नगरजन हो, मी असा अंध मी काय करणार तिथे येऊन, आणि काय पाहणार, पण मी तुम्हाला नाराज नाही करणार आपल्या कुरु राष्ट्राच्या नवीन युवराज युधिष्ठीर यांना विचारा ते जर या उत्सवाला येणार असतील तर माझी काही हरकत नाही." नगरजन युवराजांना विनंती करतात. युवराज युधिष्ठीर आपल्या आसनावरून उठून उभे राहून म्हणाले " सम्राट आपली आज्ञा असेल तर मी अवश्य जाईन." सम्राट धृतराष्ट्र म्हणाले, पुत्र युधिष्ठीर तु या उत्सवाला अवश्य जावेसे त्या बरोबरच तुझे बंधु, माता कुंती यांनाही सोबत घेऊन जावेस खूप दिवस झाले कुंती कोठेही नाही गेली तेवढेच देवदर्शनाने तिच्या मनाला सुख प्राप्त होईल." युधिष्ठीर म्हणाला "जशी आपली आज्ञा, महाराज आजच आम्ही जरूर वारणावत नगराला, महादेवांच्या उत्सवाला अवश्य भेट देऊ." असे म्हणून युधिष्ठीर आपल्या महालाकडे निघून गेले.





युधिष्ठीर-विदुर यांची भेट 

सम्राट धृतराष्ट्र यांच्या आदेशानुसार युवराज युधिष्ठीर सह आपले चार बंधू, माता कुंती या बरोबर वारणावत नगराला प्रस्थान करण्यासाठी निघाले, सूर्य डोक्यावर तळपत होता. युधिष्ठिराला वाटले की आम्ही पांडव वारणावतला जात असताना काकाश्री विदुर यांचा निरोप घेतला असता पण विदुरजी आलेच नाही. इतर मंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले विदुरजी काही कामानिमित्य हस्तिनापूर नगराबाहेर गेले आहेत. युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाल्यापासून महात्मा विदुरजी युवराज्याच्या सुरक्षेविषयी अधिक जाकरूक, सजग होते. पांडवांचे रथ हस्तिनापूर नगराबाहेर निघाले, सर्वांत पुढे युवराज युधिष्ठीर यांचा रथ त्यात राजमाता कुंती, त्यांच्यामागे अर्जुन, भीमसेन, नकुल, सहदेव यांची चार रथ वारणावत नगराच्या दिशेने निघाले. खूप अंतर गेल्यानंतर लांब अंतरावर वाटेत एक रथ उभा असलेला दिसत होता. युधिष्ठीरने सारथीला रथ थांबवण्याचा आदेश दिला आणि  म्हणाला " माता, ध्वजावरून तर काकाश्री विदुर यांचा हा रथ दिसतोय." असे म्हणून युधिष्ठीर त्या रथाच्या दिशेने पायीच निघाले. महामंत्री विदुर रथावरच बसून होते, युधिष्ठीर विदुरजींच्या चरणांवर मस्तक टेकवून प्रणाम केला आणि विदुरजी म्हणाले " दीर्घायू भव:, पुत्र युधिष्ठीर मला माझ्या गुप्तहेरांकडून असे कळले आहे की तुम्हांला वारणावत नगरात काही घातपात होण्याची शक्यता होऊ शकते, सावध राहा, तुम्ही सर्वजण दिवस मृगयाच्या निमित्याने बाहेर पडत राहा." युधिष्ठीर म्हणाला "आपण चिंता करू नये काकाश्री." विदुरजी म्हणाले, माझे गुप्तचर वेळोवेळी तुमचे रक्षण करण्यासाठी पाठवत जाईन, फक्त येवढेच सांगतो की, अरण्यात जेव्हा अग्नि प्रदीप्त होतो, वणव्याने संपूर्ण वन नष्ट होते, त्यातील प्राणी, पशु - पक्षी नष्ट होतात केवळ एकाच मूषक असा प्राणी आहे तो आपला प्राण वाचण्यासाठी भूमी खालून मार्ग तयार करून सुखरूप बाहेर पडतो." येवढे बोलून विदुरजी हस्तिनापूरच्या दिशेने निघून गेले. युधिष्ठिराच्या मनात काकाश्रीनी म्लेंछ भाषेत जे भाष्य केले तेच कानांत घुमत होते. मग पांडवही वारणावताच्या दिशेने निघून गेले.





to be continued....

द्रौपदी आणि धृष्टधुम्न जन्म

 


रामायणातील कथा

 

द्रोण शिष्यां कडून पराभव झाल्यामुळे द्रुपदाला फार दुःख झाले, झालेल्या पराभवाचा सूड घेल्याशिवाय मन स्थिर होत नव्हते. क्षत्रियतेज ब्राम्हतेजासमोर निस्तेज पडले, त्याच ब्राम्हतेजाचा नाश करण्यासाठी एक महान पुत्र असावा असेच पृषतपुत्र द्रुपदाला वाटू लागले. मनात आचार्य द्रोण यांना मारण्याचा विचार येत होता. पण द्रोणाचार्य ब्राम्हण असल्याने ब्रम्हहत्याचे पातक कोण घेणार याच विचाराने ते सदा व्याकुळ राहत होते. ही व्याकुळता पाहून पांचालच्या मंत्री पैकी कोणीतरी एकांनी त्यांना रामायणातील कथा सांगितली, अयोध्येतील चक्रवर्ती राजा दशरथाची, मंत्री म्हणाले " हे राजन !, पांचालधिपती फार पूर्वी त्रेतायुगामध्यें अयोध्या नामक राज्यांतील शूर राजा दशरथ हे पृथ्वीवरीलच नव्हे तर देवांनासुध्दा त्यांची मदत घ्यावी लागली येवढे महान राजा राज्य करत होते, पण मनात एक दुःख सतत सलत होते ते म्हणजे निपुत्र असल्याची, त्यांना महान पुत्राची अपेक्षा होती, त्यांनी ब्रम्हर्षी वशिष्ठ यांच्याकडून पुत्रकामेष्ठी यज्ञ करून घेतला तेव्हा त्यांना यज्ञातुन अग्नी प्रकट होऊन पायसचे दान दिले. दशरथानी ते पायस आपल्या तिन्ही पत्नीस म्हणजे कौशल्या, सुमित्रा आणि कैकयी यांना समान रूपात दिले. तेव्हा त्याचे फलित म्हणून कौशल्येला राम, सुमित्रेला लक्ष्मण, आणि कैकयीला भरत आणि शत्रूग्न असे चार पुत्र उत्पन्न झाले. राजन ! त्याप्रमाणे आपणही एका सिद्ध ऋषी मुनी करवी पुत्रकामेष्टी यज्ञ करून द्रोणाचार्यांचा वध करेल असा पुत्र प्राप्त करून घ्यावा." हा विचार द्रुपदला मान्य झाला कारण त्यांना माहीत होते की समस्त पृथ्वीवरील कोणताच क्षत्रिय अस्त्रवेत्ता, ब्रम्हास्त्रधारी, भारद्वाज पुत्राला, द्रोणाचार्याला हरवू, मात देऊ शकत नाही. त्यासाठी दैवी गुण असलेला एक महान क्षत्रिय पुत्र, पुत्रकामेष्ठी यज्ञाद्वारे प्राप्त करून घ्यावा, जो द्रोण वध करू शकेल. पण अडचण ही होती की कोण हे यज्ञ करणार.?

 

याज आणि उपयाज ऋषी

 

द्रुपद राजाने आपल्या पांचाल राज्यात दवंडी पेटवली की, पुत्रकामेष्टी यज्ञ करेल अशा ऋषी - मुनी यांना आमंत्रित करून त्यांना मागेल तेवढे गोधन दिले जाईल. पण हा यज्ञ फक्त पुत्रकामेष्टी यज्ञ नव्हता तर एका ब्राम्हणाची, ब्रम्हहत्येचे पातक डोक्यावर घेण्यासारखे होते. त्यामुळे हा यज्ञ कोणीही करण्यास तयार होत नव्हते. तेव्हा द्रुपदला महान तपस्वी ' याज 'आणि ' उपयाज 'या दोन ऋषी बंधु विषयी कळले. द्रुपद ' याज 'आणि ' उपयाज 'या ऋषी बंधूंची सेवा करण्यासाठी त्यांच्या आश्रमात दाखल झाले. प्रथम ते हा यज्ञ करण्यास तयार नव्हते पण द्रुपद राजाची मनोभावें सेवा पाहून शेवटी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यास होकार दिला.  (आदिपर्व अध्याय १६६, श्लोक १७ - ३३)




 

पुत्रकामेष्टी यज्ञ

 

यज्ञ करण्याचा दिवस ठरला, सिध्द - ऋषी, तपस्वी ' याज 'आणि ' उपयाज 'या दोन ऋषीनी पुत्रकामेष्टी यज्ञ प्रारंभ केला. मंत्राचे उच्चारण सुरु झाले, हवनात धृताच्या आहुत्या पडू लागल्या, यज्ञातील अग्नी भडकू लागला. तेव्हा काही कालावधीत याज ऋषी म्हणाले," हे राजन, तू मागितले आहे त्या प्रमाणे तुला महान, महातेजस्वी, पराक्रमी, शक्तिशाली पुत्र होईल. तेव्हा उपयाज ऋषी यांनी द्रोणाचार्यांचा वध करेल असा पुत्र प्राप्त होवो असा संकल्प केला आणि शेवटची यज्ञात आहूती दिली. याजने स्वतः तो दिव्य प्रसाद तयार केला होता आणि उपयाज यांनी त्या दिव्य प्रसादाला अभिमंत्रित केले होते. पण यज्ञाचा दिव्य प्रसाद घ्यायची जेव्हा वेळ येते तिथे द्रुपद पत्नी सौत्रामणी उपस्थित नव्हते, त्यांना परतण्यास उशिर झाला. याज ऋषी म्हणाले " हे देवी तुम्ही आलात किंवा नाही आलात तरीही हा प्रसाद यजमानांचे कार्य पूर्ण करणारच " असे म्हणून त्या दिव्य प्रसादाची त्यांनी यज्ञाच्या अग्नीतच आहूती दिली.

 

धृष्टधुम्न जन्म 

 

त्या यज्ञातील धगधगत्या अग्नितून एक दिव्य, तेजस्वी, धगधगत्या ज्वाला समान, एक दैवी मनुष्याची आकृती निर्माण होऊ लागली. पिवळा धमक सोनेरी मुकुट मस्तकावर शोभून दिसत होता. त्याचा धिप्पाड शरीरयष्टी, अग्नीसारखा प्रखर, तेजस्वी चेहरा, खांदयावर धनुष्य बाण, आणि हातात खङग धारण केले होते. उपयाज ऋषी म्हणाले " हा अग्निसमान कुमार तुम्हां पांचालांचें दुःख दूर करणार आहे, महाराज द्रुपद यांचे मनोरथ पूर्ण करणार आहे. द्रोणाचार्य वधासाठी याचा जन्म झाला आहे."




 

द्रौपदी जन्म 

 

त्याबरोबरच त्या यज्ञातून एक सुंदर कन्या ही उत्पन्न झाली. ती खूप सुंदर होती. काळेभोर मोठ - मोठे कमळ उमलल्यासारखे डोळे, लांब सडक, काळे, घुंगराळे केश, तिच्या शरीरातून नीलकमलाच्या फुलासारखा सुगंध येत होता. संपूर्ण आर्यावर्तात हिच्या सारखी सुंदर स्त्री कोणीही नाही, सावळी रंगाची श्यामा, कृष्णा, पांचाली, द्रौपदी या नावाने ओळखली जाईल. असे याज ऋषी म्हणाले. पण पांचालनरेश द्रुपद त्या कन्येला स्विकार करण्यास तयार नव्हते, यांना फक्त द्रोण वधासाठी पुत्र हवा होता. तेव्हा याज ऋषी म्हणाले " हे राजन, या पुत्रा सोबतच ह्या देव इच्छानुसार या कन्येचा सुध्दा तू स्वीकार कर, ही कन्या तुझे भविष्य आहे, ही कन्या  तुझ्या शत्रूंचा काळ बनेल, क्षत्रियांचा संहार करण्यासाठी या कन्येचा जन्म झाला आहे. असे म्हटल्यावर द्रुपदाने त्या कन्येचा स्वीकार केला. योग्य वेळी त्या ऋषींनी त्या यज्ञपुत्राचे नाव धृष्टधुम्न असे ठेवले, आणि कन्येचे नाव याज्ञसेनी द्रौपदी असे ठेवले.

 

to be continued....

पांडवांचे आक्रमण आणि द्रुपद बंदी




 

पांडवांचे आक्रमण आणि द्रुपद बंदी

कौरवांचे पांचालवर आक्रमण केल्यावर पांचालनरेश द्रुपदने प्रतिहल्ला करून कौरव कुमारांना बंदी बनवून टाकले. पण पाच पांडव काही केल्या सापडले नाही. द्रुपदने सर्व सैनिकांना आदेश दिला कंपिल्या नगर व त्याच्या आसपासच्या परिसरात जाऊन त्या पाच कुमारांना शोधून आणा म्हणून आदेश दिला. तेवढ्यात धनुष्यातून बाण सुटावा तसे पाचही वीर पांडव वेगाने पांचाल सेनेकडे येत होते. सर्वात पुढे गदा धारण करून भीमसेन त्याच्या पाठीमागे रथात धनुर्धारी अर्जुन. अर्जुनाच्या रथाच्या पाठीमागे धर्मराज युधिष्ठीर याचा रथ आणि त्याच्या रथाचे रक्षण करणारे खड्गधारी नकुल आणि सहदेव. हा पांडवांचा येणार बाण थेट पांचालच्या सेनेत घुसला.




भीमसेन आपल्या भल्या मोठ्या पोलादी गदेने एखादा मदमस्त पिसाळलेला हत्ती वनांमध्ये घुसून वनांचे जसे नुकसान करतो आणि त्याला आवरणे अशक्य होतं त्याप्रमाणे पांचालचे सैन्य हवेत उडू लागले. आणि त्यातील कोणी जरी वाचले तर त्यांना अर्जुन आपल्या तीक्ष्ण बाणाने वेधून काढी. नकुल, सहदेव आपल्या जेष्ठ बंधू युधिष्ठीर सहित पांचाल सेना कापत कापत थेट द्रुपदच्या रथाला भिडले.

द्रुपद - अर्जुन युध्द

द्रुपद आपल्या चालत्या रथावरून आपल्या धनुष्या द्वारे वर्षा करावी त्या प्रमाणे बाणांची वर्षा करू लागले. पण अर्जुनाने त्याचे उत्तर आपल्या वायू अस्त्राने दिले ते सर्वच्या सर्व बाण हवेतल्या हवेतच भिरकावुन लावले. त्या नंतर अर्जुनाने द्रुपदचा सारथी मारून रथ एका जागेवर स्थिर केला. द्रुपदाने आपल्या भात्यातील एक बाण काढून तो बाण अग्नी अस्त्राने अभिमंत्रित केला, तो बाण अर्जुनाच्या रथावर सोडला. अर्जुनाने हे जाणून धनुष्यावर वरुणअस्त्राचा मंत्र उच्चारला आणि रथाच्या दिशेने येणारा तो अग्नीबाण हवेतच थंड केला. अर्जुनाने चपळता दाखवत द्रुपदच्या हातातील धनुष्य भंग केला. दुसरा धनुष्य घ्यायच्या आत अर्जुनाने पाश अस्त्राने द्रुपदाला रथावरच बंदी केले. जाड अश्या दोरखंडाच्या साहाय्याने द्रुपद बंदी झाला. अर्जुनाने आपल्या कटीवरील खड्ग हातात घेवून रथातून उडी घेतली, आणि थेट चालत तो पांचाल नरेश द्रुपद यांच्या रथावर चढत द्रुपदाच्या गळ्याला हातातील खड्ग लावून सेनेला म्हणाला " थांबा ! पांचालराज द्रुपद बंदी झाले आहेत, सर्वांनी आपले शस्त्र खाली ठेवावे, नाही ठेवले तर आपल्या राजाचे मस्तक धडा वेगळे झालेच समजा."




द्रुपद बंदी

अर्जुनाच्या आदेशाप्रमाणे सर्वांनी आपआपली शस्त्रे खाली ठेवली. पांडवांकडून आज पांचाल आज पराभूत झाले होते. युधिष्ठीराने तिथल्या पांचाल सैनिकांना आदेश दिला की " शंभर कौरव बंधूंना त्वरित मुक्त करावे," त्या आदेशाबरोबरच त्यांनी कौरवांना मुक्त केले. बंदी झालेल्या अवस्थेत अर्जुनाने द्रुपदला रथात घातले आणि स्वतःही रथात बसून हस्तिनापूर सीमेच्या दिशेने निघाला. त्या रथा मागे युधिष्ठीर, भीम, नकुल, सहदेव यांची रथ ही निघाले. चर्मण्वती नदी किनारी द्रोणाचार्य आपल्या शिबिरात बसले होते तेव्हा अचानक घोडे आणि रथाचा आवाज ऐकून बाहेर आले. त्यांनी पहिले की धनुर्धर अर्जुनाच्या रथात पांचाल नरेश द्रुपद खाली मान घालून दोरखंडाने बंदी झालेला पाहून गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्याना दिलेल्या विद्येचे, शिक्षणाचे सार्थक झाल्याचे समाधान झाले. त्याचबरोबर अर्जुनाने धनुर्विद्येचा उपयोग करून पांचाल सारख्या बलाढय शत्रूचा सुध्दा पराभव केल्याचे पाहून त्यांची छाती गर्वाने भरून गेली.

द्रोणाचार्यांच्या मनात एक विचारांचे वादळ निर्माण झाले. पांचाल नरेश द्रुपदाने भरसभेत केलेला द्रोणाचार्य यांचा अपमान, विद्येचा केलेला उपहास, ते विसरले नाहीत, त्याचाच प्रतिशोध आज पूर्ण झाला. द्रुपदने आपले मस्तक झुकविलेले होते, दोरखंडात त्यांना जखडले होते, एकीकडे नकुल आणि दुसरीकडे सहदेव यांनी त्यांना दोरखंडाच्या साहाय्याने खेचत होते. पांडव द्रुपदाला घेऊन जवळ येताच, जेष्ठ पांडव युधिष्ठीर यांनी प्रणाम करून नम्रपणे म्हणाला " हे गुरुदेव आम्हांकडून आपण सांगितलेली गुरुदक्षिणा स्वीकार करावी." गुरु द्रोणाचार्य खुश होऊन म्हणाले " पांडवांनो तुमचे सदैव कल्याण होवो, यशस्वी भव: " त्यांनी द्रुपदाला दोरखंडातून मुक्त करण्याचा आदेश दिला. गुरु द्रोणाचार्य म्हणाले " हे पांडवांनो, आपली गुरुदक्षिणा मला मान्य आहे. माझ्या मित्राला आता मुक्त करा." द्रुपदने आश्चर्याने आपली मान वर केली त्यांना हे काय होतंय काहीच कळेना. नकुल - सहदेव यांनी पांचाल नरेश यांना दोरखंडाच्या बंधनातून मुक्त केले.




अपमानाचा वचपा 

द्रोणाचार्य उपहासाने द्रुपदाला म्हणाले " हे मित्र द्रुपद, पाहिलंस का ?, मी केवळ मैत्री मागितली होती, तू तर मैत्री सोडच उलट माझा अपमान केला होतास, आणि मला म्हणाला होतास की मैत्री फक्त बरोबरी असणाऱ्यातच होऊ शकते. बघ ! आज मी संपूर्ण पांचाल राज्य जिंकून राजा झालो आहे. पण तुझ्याकडे कुठे राज्य आहे. तू तर माझ्या बरोबर मैत्री करण्यास सुध्दा योग्य राहिला नाहीस, पण मला तुझी केवळ मैत्री हवी होती मित्र द्रुपदा !, तू माझा आणि माझ्या विद्येचा अपमान केला होतास तेव्हा मी शपथ घेतल्या प्रमाणे माझा शिष्यच तुझा पराभव करेल असे म्हणालो होतो ते वचन माझ्या शिष्यानी पूर्ण केले आहे, तू म्हणाला होतास ज्याला राज्य नाही तो राजाचा मित्र असू शकत नाही. म्हणून मी तुझे संपूर्ण पांचाल शिष्यांकरवी जिंकले आहे , या माझ्या पांचाल राज्याचे अर्धे राज्य म्हणजे गंगेच्या दक्षिणेकडील अर्धे पांचाल राज्य तुला देतो. आणि उत्तरेकडील अर्धे पांचाल राज्य मी स्वतःकडे ठेवतो. आता आपण दोघेही राजे झालो आहे. आता आपल्यात मैत्री असण्यात काहीही हरकत नाही."

द्रुपद खजील होऊन, खाली मन घालून चालत आपल्या कंपिल्या नगराकडे निघून गेला.




to be continued....

पांचालवर आक्रमण आणि द्रुपद आगमन

 

दुर्योधन की युधिष्ठीर





सर्व कौरव, पांडव आपल्या सर्व शस्त्र सहित चर्मण्वती नदी ओलांडून पांचाल राज्यात प्रवेश केला, एक छोटी तुकडीच भासत होती, पण काही अंतर गेल्यावर दुर्योधन आपल्या सर्व बंधू सह एके ठिकाणी थांबला, त्याने जेष्ठ पांडव युधिष्ठीरला म्हणाला " हे युधिष्ठीर, मला आपल्या साहाय्याची आवश्यकता नाही, मी आणि माझे बंधुच पांचालनरेश द्रुपदला बंदी करण्यासाठी पर्याप्त आहेत. आपण वापस जावे." युधिष्ठीर म्हणाला " नाही दुर्योधन, मी जेष्ठ आहे आणि तुमच्या सर्वांची जबाबदारी माझी आहे." दुर्योधन हसत म्हणाला " तुम्ही रक्षण करणार का ? तर चला मग तुमच्यात आणि माझ्यात द्वंद्व करून पाहू की कोण अधिक बलशाली आहे ? आणि जो जिंकेल तोच द्रुपदाला बंदी करेल " युधिष्ठीर म्हणाला " हे बंधू, सुयोधना दोन लाकडात जेव्हा घर्षण होते तेव्हा अग्नि निर्माण होऊन संपूर्ण वन जळून जाते त्या प्रमाणे दोन बंधुमधील वाद संपूर्ण कुठुंम्ब नष्ट करते. हस्तिनापूरच्या सीमेवरच कुरुकुमार आपसातच युध्द नाही करू शकत." दुर्योधन रागाने म्हणाला " मला प्रवचन नको आहे, निर्णय सांगा." युधिष्ठीर म्हणाला " हे सुयोधना, आपल्यातील वाद हा आपल्यातच राहावा, आपल्यात युध्द म्हणजे कुरु वंशाचा आणि आपल्या पूर्वजांचा अपमान होईल. तेव्हा मी जेष्ठ म्हणून तुला आदेश देतो की, जा पांचाल नरेश द्रुपदाला बंदी करून घेऊन ये, मी तुला प्रथम संधी देतो जा, यशस्वी भव:" (आदिपर्व अध्याय १३७, श्लोक १ - १८).

कौरवांचे प्रथम आक्रमण

दुर्योधन आनंदी होऊन आपल्या सर्व शंभर बंधू सह रथांत बसून पांचालच्या दिशेने निघुन गेले. आणि मागे फक्त धुळीचे लोळ उठत राहिले. तेव्हा अर्जुन त्रागाने म्हणाला " जेष्ठ हे काय केलंत, दुर्योधनला का पहिले पाठवलेत." भीमसेन म्हणाला " आपण युध्दात भागच नाही घेतलो तर तर आपण विजयी कसे होणार ?" युधिष्ठीर स्थिर मनाने म्हणाला " अर्जुन - भीम हे लक्षात घ्या की, महारथी द्रुपद हा उत्तम धनुर्धर आहे. माझ्या या शंभर बंधुत असा कोणताच धनुर्धर नाही, जो महारथी द्रुपद यांचा सामना करू शकेल. आपली मदत त्यांना घ्यावीच लागेल मला काळजी एवढयाच गोष्टीचे वाटतंय की माझ्या शंभर कौरव बंधूंना द्रुपद कोणती इजा करणार नाही ना ?"





द्रुपद सेनापती शिखंडी

दुर्योधन आपल्या सर्व बंधू सोबत पांचालच्या राज्यावर भयंकर तुटून पडले, पांचाल चा काही भाग त्यांनी जिंकला पण त्यांना पांचालनरेश द्रुपदाला बंदी बनवायचे होते. कंपिल्यानगराच्या जवळ दुर्योधन व इतर बंधू जाऊन पोहोचले, नगरात प्रवेश करताच नगरातील नागरिकांनी भयंकर हल्ला चढवला. त्यांच्या रूद्र अवतार पाहून कौरव बंधू थोडे मागे हटले पण मागे येताच दुर्योधन, विकर्ण, दुःशासन पांचाल प्रजेच्या माऱ्याने मागे जाणाऱ्या बंधूंना धीर देऊन युध्दाला प्रवृत्त करत होते. तेवढ्यात भयंकर, कर्णकर्कश तुतारी, शंख, ढोल अश्या गगनभेदी आवाजासह पांचालनरेश द्रुपदच आला आहे की काय असे दुर्योधनाला वाटले, पण जवळ येताच कळले की हा द्रुपद नसून त्याचा सेनापती आहे. दुर्योधनाने आपल्या बंधूला अधिकच चेतवून त्या येणाऱ्या सैनिकांवर तुटून पडले. दुर्योधनाने सारथीला सांगून आपला रथ द्रुपद सेनापतीच्या रथाला भिडवायला सांगितला. प्रथम दोघांचे धनुष्य बाणाने युध्द करू लागले, दुर्योधनाने आपल्या बाणाच्या साहाय्याने शिखंडीच्या रथाचा ध्वज, सारथी, धनुष्य मोडून काढले, तेव्हा शिखंडी रागाने खङग घेऊन रथातून बाहेर आली.

दुर्योधन पण धनुष्य बाण रथात ठेवून वर्षा ऋतूतील ढग गर्जना करतात त्या प्रमाणे गर्जून आपल्या हातात अवजड गदा घेऊन रथातून उडी घेतली. दोघेही भयंकर युध्द करत होते पण शिखंडीची शक्ती थोडी कमी पडू लागली आणि काही वेळेतच दुर्योधनाने आपल्या गदेच्या भयंकर आघाताने मूर्च्छित केले, दोघांमध्ये भयंकर युध्द झाले. कौरव बंधू अधिक स्फूर्तीने लढले त्यांनी द्रुपद सेनापतीचा पराभव केला. मूर्च्छित पडलेल्या शिखंडीच्या मस्तकावरील युध्दाचा मुकुट कडून पहिले तर एक स्त्री सेनापतीचा वेष धारण करून आलेली होती. दुर्योधनला आश्चर्य वाटले तो मोठ्याने हसत म्हणाला " हे कुरु वीरांनो हे पहा पांचाल मधील सर्व पुरुष नपुसंक झाले आहेत की काय त्यांनी सेनापती म्हणून एका स्त्रीला युध्दात पाठविले आहे पहा."





द्रुपदचे हल्ल्याचे उत्तर

अचानक धनुष्याचा कर्णकर्कश टंकाराने सर्वांचे लक्ष्य वेधले कंपिल्यानगराच्या मुख्य मार्गाद्वारे मध्यान्हात सूर्य तळपतो त्याप्रमाणे स्वत: पांचालनरेश द्रुपद आपल्या श्वेत अश्वांच्या रथावरून येत होते, त्यांनी रणवेष धारण केला होता. चार अश्वांचा रथात द्रुपद धनुष्यबाण धारण केले होते, पाठीवर गच्च भरलेला बाणांचा भाता होता, डोक्यावर मुकुट, शरीरावर पोलादी कवच धारण केले होते. शंख, तुतारी, मृदूंग, ढोल, भेरी इत्यादी असंख्य वाद्ये वाजत होते. पांचाल सैन्य मोठ - मोठ्याने गर्जना करत द्रुपद रथाच्या पाठीमागे धावत येत होते. दुर्योधन आपल्या रथात परत येऊन धनुष्य धारण केले, पण द्रुपदाच्या पाच बाणाने धनुष्य, कवच, ध्वज, सारथी यांना ठार केले. द्रुपद आपल्या धनुष्याच्या आधारे वरुणदेव जसे वर्षा करतो त्याप्रमाणे बाणांची वर्षा करू लागले. बाणांची वर्षा करत सैनिकांना आदेश देत होते की," सैनिकांनो या एकशे पाच कौरव कुमारांपैकी एकही सुटता कामा नये सर्वाना बंदी करा." त्या बाणांच्या वर्षावाने मात्र कौरव घाबरून गेले, आणि माघारी पळू लागले. पण ज्या प्रमाणे अजगर आपल्या शरीराच्या विळख्याने आपले भक्ष्य जखडून ठेवतो त्याप्रमाणे पांचालच्या सैनिकांनी त्यांना अडवून दोरखंडाने बंदी केले. तेवढ्यात त्यांना हे कळले की, हे कौरव कुमार एकशे पाच नसून फक्त शंभर आहेत. द्रुपद अधिकच चवताळले त्यांनी सैनिकांना आदेश दिला की " सैनिकांनो, नगरांत या नगराबाहेर त्या पाच कुरु कुमारांचा लवकरात लवकर शोध घ्या, जा लवकर ."

to be continued....

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...